व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

सरकारला दिलेली मुदत संपली! पुढं काय?, मनोज जरांगे पाटलांनी केली सर्वात मोठी घोषणा

Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या मराठा आरक्षणाबाबत जाहीर सभा घेत आहेत. मनोज जरांगेंनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची तारिख दिली आहे, मात्र अद्याप आरक्षण देण्यास राज्य सरकारला यश आलेलं नाही, तसेच सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याबाबतही निर्णय झाला नाही, त्यामुळे मनोज जरांगे पाटील या निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आज बीड येथे जाहीर सभा घेतली. या वेळेस त्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे.

काय म्हणाले जरांगे पाटील?

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची बीड येथे जाहीर सभेचं नियोजन करण्यात आलं होतं. राज्यात अनेक ठिकाणी जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी  (Maratha Reservation) जाहीर सभा घेतल्या आहेत. दरम्यान, जरांगे पाटील यांनी सभेत बोलत असताना एक महत्त्वाची घोषणा केली आहे. जरांगे पाटील म्हणाले की, “येत्या 20 जानेवारीपासून मी मुंबई येथील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरु करणार आहे.”

“जोवर मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, तोवर मी आंदोलन आणि उपोषण करत राहणार”, असं जरांगे पाटील (Manoj Jarange) म्हणाले होते. आंतरवली सराटीपासून मुंबईपर्यंत पायी जाणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. गेले काही दिवसांपासून जीवाची पर्वा न करता जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी राज्यात जाहीर सभा घेत आहेत. यानिमित्ताने त्यांनी आपल्या आंदोलनाची पुढील भूमिका देखील जाहीर केली आहे.

राज्य सरकारने आश्वासन पाळलं नाही?

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्याच्या आंतरवली सराटीमध्ये आमरण उपोषण पुकारलं होतं, या उपोषणादरम्यान आंदोलकांवर लाठीचार्ज झाला होता, त्यानंतर जरांगे पाटलांनी उपोषण आणखी तीव्र केलं होतं.

राज्य सरकारने आंदोलन मागे घेण्यासाठी अनेक प्रयत्न करुन पाहिले मात्र मनोज जरांगे पाटलांनी जुमानलं नाही, अखेर काही दिवसांनंतर त्यांनी सरकारला यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी वेळ दिला, जरांगेंनी आपलं उपोषण तात्पुरतं स्थगित केलं. दुसरीकडे मराठा समाजाच्या आंदोलकांनी साखळी उपोषण सुरु ठेवलं होतं तसेच जरांगे पाटील (Manoj Jarange) देखील महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात जाऊन सभा घेत होते.

अखेर 24 डिसेंबरपर्यंतची मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली वेळ संपत आली आहे, मात्र मराठा आरक्षणासंदर्भात कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही, त्यामुळे आता मनोज जरांगे पाटलांनी आपली पुढची लढाई सुरु केली आहे. 20 जानेवारीपासून मी मुंबई येथील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरु करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

Leave a Comment