धाराशिवः मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारपासून राज्यभरात दौरा सुरु केला आहे. सकाळी अंतरवाली सराटी इथून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली असून रात्री धाराशिवमध्ये जाहीर सभेला त्यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी ७० वर्षांची मराठा समाजाची सल बोलून दाखवली.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, तुम्हीच खोडीचे आहात. तुम्ही नेत्यांच्या तीन-तीन पिढ्या मोठ्या केल्या. त्यांच्या पोरांना तुम्ही साहेब म्हणता. परंतु आपल्या पोरांना त्यांची काहीच मदत झाली नाही. ७० वर्षांमध्ये ज्या नोंदी सापडत नव्हत्या त्या आता सापडत आहेत. २४ डिसेंबरला कायदा पारित होणार आणि मराठ्यांना ५० टक्क्यांच्या आतलं आरक्षण मिळणार.
ते पुढे म्हणाले, ७० वर्षांमध्ये मराठ्यांना आरक्षण असतं तर जगातली सगळ्यात सुधारित आणि पुढारलेली जात मराठा असती. आजपर्यंत कुणी ह्या नोंदी दडवून ठेवल्या होत्या? कुणामुळे ७० वर्षे मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही? त्याचं उत्तर मिळालं पाहिजे. आता ते कितीही बोंबलत बसले तरी मराठ्यांना आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार.
“नेत्यांची पोरं परदेशातून शिकून येतात. तो साहेबांचा भैय्या इन करतो अन् आपण त्याला बाळासाहेब म्हणतो. तेच आज मराठ्यांना विरोध करत आहेत. मराठ्यांनी ठरवलं तर त्यांना चड्डी- बनियनसकट झोडून काढतील. त्यांना आयुष्यभर मराठे गुलाल लागू देणार नाहीत.. जो आपल्या पोरांच्या मुळावर उठेल तो आपला नाही. आता फक्त आपल्याला पोरांचा फायदा बघायचा आहे. सगळ्यांनी एकजुटीने पुन्हा एकत्र यायचं आहे आणि गावागावातल्या मराठ्यांना जागरुक ठेवायचं आहे.”
जरांगे पाटील पुढे म्हणाले की, धाराशिवमध्ये सकाळी ११ ची सभा होती तरी रात्री ८ वाजेपर्यंत लोक वाट बघत आहेत, याचा अर्थ सरकारला आता आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही. मी मरायला भीत नाही, मला काही झालं तर हे आग्या मोहोळ त्यांचं काय करेल.. त्यामुळे आमच्या नादाला लागू नका आम्हाला फक्त आरक्षण द्या. ओबीसी बांधवांना आता हे कळायला लागलंय आणि दलित बांधवांनाही लक्षात आलेलं आहे की, मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या आहेत; याचा अर्थ त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. म्हणून ते नेत्यांनाही सांगत आहेत, विरोध करु नका.